| |
|
| |
Aug 24, 2009 5:34 pm |
|
मानसिक ताण टाळण्यासाठी संवाद साधा! |
Shreerang Athalye
| |
मानसिक ताण टाळण्यासाठी संवाद साधा! शारीरिक स्वास्थ्यासाठी उत्तम योग्य आहार आणि त्याला व्यायामाची जोड असणे अतिशय आवश्यक असते. त्यानुसार अनेक जण आहार-विहारात बदल करतानाही आपल्याला दिसून येते, पण स्पर्धेच्या या काळामध्ये शरीरस्वास्थ्याबरोबर मानस स्वास्थ्यही लाभणे तितकेच आवश्यक आहे. भरपूर पैसा, कीर्ती मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेमध्ये मानसिक स्वास्थ्य मात्र हरवले जाते. काही वेळा जवळची माणसेही दुरावली जातात आणि मग इच्छित कार्य साध्य झाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी जिवाभावाच्या व्यक्ती पूर्वीइतक्या मोकळेपणाने साथ देतीलच याची शाश्वती नसते. व्यवसायातील ताणामध्येही मन मोकळे करण्यासाठी कोणाकडे जावे, असा प्रश्न आजकाल लोकांना पडू लागला आहे. या मानसिक एकटेपणाचे रूपांतर एकलकोंड्या स्वभावात होते आणि डिप्रेशन, आत्महत्या या स्वरूपाच्या घटना दिसून येतात. हे टाळण्यासाठी आवश्यक आहे, तो एकमेकांमधला संवाद. तो फक्त नोकरी-व्यवसायाशी संबंधितच असला पाहिजे असे नाही; तर घरगुती पालक, मुलं, सासू-सासरे आणि इतर नातेवाईक, शेजारी मित्र यांच्यातही असायला हवा. आयुर्वेदशास्त्रात शरीर आणि मन या दोन्हींचा विचार केला गेला आहे, त्यात सद्वृत्तविचार मांडताना संवाद कसा असावा, याचा उल्लेख आहे. पूर्वाभिभाषी सुमुखः। आपल्याकडे आलेल्यांशी मुखावर स्मितहास्यपान ठेवून संवाद साधावा. धर्म्यमर्थ्यां प्रियं तथ्यं मितं पथ्यं वदेद्वच ! धर्म व अर्थ साधक प्रिय, खरे व मोजके हितावह संवाद साधावेत. आपल्या बोलण्यात गर्व, दुसऱ्यांना कमी लेखणे, टोचून बोलणे, टोमणे मारणे, कधीही असू नये ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन जिंकून घेणे सहज सोपे होते. कारण या संवादाने नवीन मैत्री होऊन ओळख तयार होते. नोकरी व्यवसायात किंवा घरगुती जीवनात खचखळगे हे असणारच! त्यामुळे विशिष्ट प्रसंगामध्ये गैरसमज, भांडणे या गोष्टीतील ओघाने येतात, अशा प्रसंगी आपले विचार, शब्द जपून वापरून मांडले गेलेच पाहिजेत. कारण या ठिकाणी संवाद साधलाच गेला नाही, तर गैरसमज वाढतच जातील, अनेक जणांना गप्प बसण्यात शहाणपणा वाटतो; पण त्या वेळी लगेच नाही जमलं तर "वेळ पाहून' आपले म्हणणे शांतपणे पटवून दिले पाहिजे. त्यामुळे आपले म?ही मोकळे होते आणि विलक्षण हलकेपणा जाणवतो. अनेक आई-वडील तक्रार करतात आमचे मूल खूप अबोल आहे! पण अशा वेळी आपण स्वतःहून त्याच्याशी संवाद साधून त्याला बोलते केले पाहिजे. घरी गप्पा मारत असताना जर साधा विषय असेल, तर त्यालाही संवादात सामील करून घेतले पाहिजे. अभ्यास, शाळा, क्लासेस या सर्व गोष्टींव्यतिरिक्त आजूबाजूला असणारे आनंददायक क्षण यांचा आस्वाद घेऊन तो व्यक्त करायला सांगितले पाहिजे. हादेखील संवादाचाच एक भाग आहे. अशा पद्धतीत संवाद साधल्याने मुलं आपोआप मोकळी बनतात. मुलांवर संस्कार करतानासुद्धा अनेक पालक मुलांना त्यांच्या चुकीची शिक्षा म्हणून त्यांच्याशी "संवाद' तोडतात, बोलत नाहीत. पण त्यामुळे "त्या' विशिष्ट प्रसंगात कसे वागले पाहिजे हा महत्त्वाचा संस्कार मुलावर होतच नाही. उलट पालक न बोलल्याने मानसिक दुरावा निर्माण होण्याचीच शक्यता जास्त वाटते. परिणामी, मूल अबोल, चिडचिडे किंवा विचित्र वागू लागते. मोठ्या व्यक्तींप्रमाणे लहान मुलांनाही ताण असतो जो मनमोकळेपणाने बोलून दूर करता येतो. काले हितं मितं ब्रुयात विसंवादी पेशलम्। काळ, वेळ आणि प्रसंग पाहून मृदुपणाने; पण हितकर संशयरहित परखड आणि सत्य विचार मांडावेत. बुद्धीला स्थिर देऊन सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून पुढील चांगल्या-वाईट परिणामांचा विचार करून मगच महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधावा. त्यामुळे पुढे होणारी वादळे आपण टाळू शकतो. घरगुती जीवनातही संवाद साधला गेलाच पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर समवयस्क मंडळींबरोबरच घरातील वरिष्ठांसमवेतही ती आनंदी गोष्ट वाटून घेतली पाहिजे. काही वेळा अनेक प्रसंग असे येतात, की नकळत आपल्याबद्दल गैरसमज होतात, अशा प्रसंगी रडत बसण्यापेक्षा, मनात कुढत बसण्यापेक्षा किंवा नशिबालाच दोष देऊन गप्प बसण्यापेक्षा शांतपणे संवाद साधून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण इथे शब्द मात्र जपून वापरले पाहिजेत. अशा पद्धतीचा संवाद कधीच "भांडणा'चे स्वरूप धारण करत नाही, उलट एकमेकांमधील गैरसमज दूर होऊन स्नेह वाढतो. एकटेपणा दूर होतो. एखाद्या प्रसंगामध्ये आपली चूक असेल तर ती मोकळेपणाने कबूल करण्यातही कमीपणा वाटून घेऊ नये, त्यामुळे आपले मनही शांत आणि तणावमुक्त राहते. सध्या धावपळीच्या दिनचर्येमध्ये "संवाद' कुठे तरी हरवला जात आहे, ज्यामुळे मनावरचा ताण हलकाच होत नाही. त्यामुळे मला मनापासून असे वाटते, की एकमेकांशी संवाद साधल्याने मन अधिक उत्साही आनंदी राहून जीवनातील सुख-दुःखांना सामोरे जाण्यास "तयार' बनेल. वैद्य विनिता कुलकर्णी
Private Reply to Shreerang Athalye (new win) |
|
| |
|